13/07/2024
उद्योगातल्या यशाची त्रिसूत्री - वेळ, पैसा आणि नियोजन.
आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून उद्योजक घडवण्यासाठी आम्ही कुठलेच पैसे घेत नाही. उद्योजकांनी कर्ज घेतले असल्यास व्याजावर व्याज चढू दिलं नाही तरच, तो उद्योग वाचू शकतो. उद्योजकांनी आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतही आम्ही मार्गदर्शन करतो. वेळ, पैसे यांचं व्यवस्थापन आणि मनुष्यबळ ही उद्योगाची त्रिसूत्री आहे. कोणतेही काम आज केले पाहिजे, उद्या कधीच येत नसतो, असं माझं ठाम मत आहे. उद्योग यशस्वी करायचा असेल तर उत्पादनाचे मार्केटिंग महत्त्वाचे असते. मी ब्रँडेड फूड प्रॉडक्टच्या दुकानांबाहेर उत्पादनांचं मार्केटिंग केलं आहे. जिथे महिला आहेत तिथे मार्केटिंग करा, ‘उद्यमेन ही सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः म्हणजेच तुम्हाला जर एखादा उद्योग करायचा असेल, तर तुम्ही आळस सोडा, अधिक कार्य करा आणि कृती करा म्हणजे कोणतेही कार्य असाध्य नाही. फक्त अहोरात्र मेहनत करा असे मी सांगते.
ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या संधी सतत हेरत राहिलं पाहिजे. पूर्वी मंत्रालयात ‘कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअरमध्ये’ १०० रुपये घेऊन एक टेबल लावायला द्यायचे. तिथेही विक्री केली जायची. मग हळूहळू शाळा, बँक्स, हॉस्पिटल्समधल्या महिला वर्गापर्यंत उत्पादनविक्री सुरू झाली. मग ज्या ठिकाणी स्त्री नोकरदारांची संख्या जास्त आहे, तेथेच जायचे एखाद्या मैत्रिणीच्या ओळखीने ‘लंचटाइम’मध्येच जायचे आणि दर महिन्याच्या २५ ते ५ तारखेदरम्यानच जायचे, कारण तो काळ पगाराचा असतो. अशा प्रकारच्या संधींचा सतत शोध घ्यायला हवा असं मला वाटतं.
वेळेचे, पैशाचे नियोजन, मार्केटिंग कसे करावे या प्रश्नांची उत्तरं देणारी संघटना म्हणजे आमची ‘आम्ही उद्योगिनी’
उद्योग कसा सुरू करावा,* तो यशस्वीरित्या पुढे कसा रेटावा, आपल्याला कोणत्या सरकारी योजना उपयुक्त ठरतील, वेळेचे, पैशाचे नियोजन, मार्केटिंग कसे करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी संघटना म्हणजे आमची “आम्ही उद्योगिनी” आहे. तेव्हा तुम्हाला कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या क्षमतांची आधी पारख करा. कोणतीही महिला घरची जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे त्या जबाबदाऱ्या पेलून तुम्ही पुढे जा. मिळालेल्या संधीचं सोनं करा. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही कशी मात कराल याचा अभ्यास करा. अशा अनेक पैलूंचा विचार करून तुम्ही व्यवसायात उतराल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असा माझा यशाचा कानमंत्र आहे.
उद्योजक होण्यासाठी यश मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतरही अविश्रांत काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे.
माझ्या मते, उद्योजक होण्यासाठी यश मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतरही अविश्रांत काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे. आपण जे काम करतो त्याच्याबद्दल आदर हवा. समोरच्याचा विश्वास कमावता यायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामाला अध्यात्माची सांगड हवी असं मला वाटत. आपल्याकडे कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासह उद्योगाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मला वाटते.
श्रावण गुरव- (फाउंडर एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,इडीपी प्रोग्राम हेड ब्लाॅगर,लेखक, बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, संपर्क-+919322567546)
EveryoneK