28/02/2024
*NPK जिवाणू म्हणजे काय?*
*NPK जीवाणूंचे काम काय ?*
१) नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू
रायझोबियम, अझोटोबॅक्टर, एझोस्पायरिलम ही नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत, तर सुडोमोनस, बॅसीलस जिवाणू, ही स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते आहेत. जिवाणू खताचे वेगळेपण असे आहे की, पिकांना आवश्यक असणारे कुठलेच मूलद्रव्य त्यात नसते. ही खते पिकांना लागणारी अन्नमूलद्रव्ये हवेतून किंवा जमिनीतून उपलब्ध करून देतात. जसे, नत्रवायू हवेत असतो, पण तो पिकांना घेता येत नाही. रायझोबियम जिवाणू द्विदल पिकाच्या बियाणांस चोळून पेरणी केली असता, पिकांच्या मूळांवर ते ग्रंथी स्वरूपात वास्तव्य करतात. तिथे त्यांची भरमसाट वाढ होते. स्वत:चे अन्न पिकाकडून मिळवित असतानाच हवेतील नत्र वायूचे स्थिरीकरण ते करतात व हा नत्र पिकांना अमोनियाच्या स्वरूपात मुळांवाटे उपलब्ध करून देतात.
२) स्फुरद विरघळविणारे जिवाणू
स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के स्फुरदपिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम स्फुरद विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात. स्फुरद विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे. स्फुरद विरघळविणारे जिवाणू अनेक कार्बनी आम्लांचे स्रवण करून जमिनीतील अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेला स्फुरद द्राव्य स्वरूपात पिकांस उपलब्ध करून देतात.
३) पालाश विरघळविणारे जिवाणू
पालाश हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे. परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १o ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
४) झिंक विरघळविणारे जिवाणू
झिंक हे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळविण्याचे काम हे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते. झिंक विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.